पनवेलमधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ... नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या प्रगतीचा नवा उड्डाणबिंदू - पंतप्रधान नरेंद्र मोदी ...महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि.बा.पाटील यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पनवेल (प्रतिनिधी)- देशाच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणारा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात, महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि.बा.पाटील यांचे स्मरण करत दिबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला.समाजासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले,ती आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांचे जीवन समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी नेहमी प्रेरीत करणारा आहे,असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल आचार्य देवव्रत,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार व नागरी उड्डयन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री माधुरी मिसाळ, मंत्री आदिती तटकरे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले, भारतातील जपानचे राजदूत ओनो केईची, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, आदी उपस्थित होते. या सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार चित्रा वाघ, आमदार महेंद्र थोरवे, यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
विमानतळाच्या उद्घटनासोबत या सोहळ्यात मुंबई वन अँप आणि शासकीय आयटीआय व शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमध्ये अल्प मुदतीचे रोजगारक्षम कार्यक्रमाचे अनावरण झाले तसेच मुंबई मेट्रो लाईन ३ चे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सन २०१८ साली या विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन आणि आता लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दाखविलेल्या दूरदृष्टीची आणि कार्यसिद्धीची प्रचिती या निमित्ताने आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हंटले कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारताच्या प्रगतीचा नवा उड्डाणबिंदू आहे.येथे केवळ विमाने नाही, तर नवी स्वप्ने आणि संधीचे उड्डाण होणार आहे. नवी मुंबईचे प्रदीर्घ काळाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे तसेच या शहराला भूमिगत मेट्रोही मिळाली आहे. भूमिगत मेट्रो हा विकसित भारताचे चित्र आहे. या विकासकामात योगदान देणार्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि.बा. पाटील यांचेही स्मरण करतो. त्यांनी समाज, शेतकर्यांसाठी ज्या सेवाभावाने काम केले ते आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी या वेळी काढले. विकसित भारताचे काम वेगाने सुरू आहे. जेव्हा पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत असते तेव्हा भारताचा वेग दिसून येतो. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर हवाई चपल घालणाराही हवाई सफर करणार, अशी ग्वाही मी दिली होती. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. २०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज देशात १६० पेक्षा जास्त विमानतळे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. आज कौशल्य विकासासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. सध्याचा काळ हा देशातील तरुणाईला विविध संधी उपलब्ध करून देणार आहे. संपूर्ण देश हा विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. विजयादशमी झाली, कोजागिरी झाली, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशा मराठीत पंतप्रधानांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आम्ही वर्षानुवर्षे हे विमानतळ होणार असे फक्त ऐकायचो. मोदींजींकडे बैठक घेतली आणि अवघ्या पंधरा दिवसांत विमानतळाच्या कामाला मंजुरी मिळाली.आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे.या विमानतळामुळे राज्याचा जीडीपी एक टक्क्याने वाढणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात लागतो, तिथे सोने होते. नवीन भारताचा संकल्प हा मोदींच्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे सांगितले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो आता पूर्ण झाला आहे. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आपल्या भाषणात हवाई वाहतुकीचा आढावा मांडला. तसेच त्यांनी यावेळी मराठी भाषेतही भाषण केले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा शाश्वत विकास होत असल्याचे नमूद केले.
Post a Comment