महेंद्रशेठ घरत हेच अंतुलेंचे वारसदार : राजेश शर्मा ....शेलघर येथे जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक
उलवे : ``काँग्रेस गांधीवादी विचारांनीच पुढे न्यायची आहे, संपूर्ण देशात गांधीवाद पेरू या,अंतुले साहेब हे रायगडचे,पण देशपातळीवर नाव असलेले व्यक्तिमत्त्व होते.प्रशासनाचा विषय येतो तेव्हा त्यांची आजही आवर्जून आठवण काढली जाते. तसेच रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे डॅशिंग नेतृत्व आहे,त्यांनी रायगडमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी दिली आहे, ते पदरमोड करून कार्यकर्त्यांना साथ देतात, खंबीरपणे मागे उभे राहतात, हे कार्यकर्त्यांचे म्हणणे मला मान्य आहे.ते अंतुले साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून काम करीत आहेत,त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे,म्हणूनच महेंद्रशेठ घरत हेच अंतुलेंचे खरे वारसदार असतील,’’ असे गौरवोदगार मुंबईचे माजी महापौर आणि काँग्रेस निरीक्षक राजेश शर्मा यांनी शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत काढले.
त्यामुळे आगामी काळात काँग्रेस नेतृत्व महेंद्रशेठ घरत यांचा निश्चितच विचार करील,असेही मत राजेश शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. २२) शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी राजेश शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
``अंतुले साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना अनेक धाडसी निर्णय घेतले. मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना वैयक्तिक आर्थिक ताकद दिली. आंदोलने केली, त्यामुळे माझ्या नावावर अनेक गुन्हे दाखल झाले, आज बऱ्याच वेळा कोर्टकचेऱ्यांत धावपळ करताना दमछाक होते, पण काँग्रेस सोडणार नाही. `जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ’, हीच माझी काँग्रेस पक्षाविषयी भूमिका आहे. अनेकांना मी नोकऱ्या दिल्या, मतदारसंघ बांधणीसाठी पदरमोड करून अनेक तालुक्यांत पक्ष कार्यालयांचे भाडे भरतोय, काहींना तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासले, तरीही त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली; परंतु पक्ष सोडणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे,भाजपची अवस्था रेल्वेसारखी झाली आहे, इतर पक्षांच्या नेत्यांना घेऊन उभे राहायला जागा नाही इतपत ती भरली आहे, उगाच तिथे जाऊन गुदमराल, दरवाजातून पडाल, त्यापेक्षा काँग्रेसमध्ये सन्मानाने जगा,आज ना उद्या काँग्रेसला `अच्छे दिन’ येतील, असा सल्ला महेंद्रशेठ घरत यांनी पक्षांतर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिला.
यावेळी राजेश शर्मा म्हणाले, ``रायगड हा अंतुलेंचा बालेकिल्ला आहे.रायगडमध्ये काँग्रेस मजबूत करण्याची महेंद्रशेठ घरत यांच्यात धमक आहे.त्यासाठी सोशल मीडिया मजबूत करा,पक्षाशी तरुणांना जोडा आणि कामाला लागा.’’
आम्हाला कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा आणि आर्थिक ताकद देणाराही नेता हवा,यासाठी महेंद्रशेठ घरत हेच सक्षम आहेत,असे मत बैठकीसाठी आलेल्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी रायगडच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना निरीक्षक राजेश शर्मा यांनी उत्तरे दिली तसेच प्रत्येक कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी सरचिटणीस मिलिंद पाडगावकर,ॲड.श्रद्धा ठाकूर, नाना म्हात्रे,महेंद्र ठाकूर,विनोद म्हात्रे,अशोक मोकल, रिचर्ड जॉन,अखलाख शिलोत्रे,जे.डी.जोशी,मार्तंड नाखवा,किरीट पाटील,वैभव पाटील तसेच रायगड जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष,जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
Post a Comment