...... तब्बल ३८ वर्षांनी पुन्हा एकदा भरली शाळा ! , इतक्या वर्षांनी एकत्र जमा होण्यासाठी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म
रसायनी (प्रतिनिधी) :- ग्राम सुधार मंडळ संचालित जनता विद्यालय मोहोपाडा विद्यालयाच्या सन १९८६-८७ च्या १० वी बॅचचे सर्व बालमित्र,बालमैत्रिणी आपापली सर्व कामे बाजूला ठेवून तब्बल ३८ वर्षांनी प्रथमच एकत्र आले.श्री.अशोक मुंढे यांच्या मोहोपाडा – चांभार्ली, रसायनी येथील फार्म हाऊस येथे आयोजित केलेल्या स्नेहमेळावा (Get-Together) कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी विद्यालयाचे दिवंगत शिक्षक - शिक्षिका भाटवडेकर मॅडम, चौधरी मॅडम,दहीफळे सर,वाणी सर,चेंडगे सर आणि कोरोनामध्ये मयत झालेला वर्गमित्र लक्ष्मण माळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ.मनोज कुचेरिया यांनी बनवलेल्या व्हाटसअप ग्रुपच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून इतक्या वर्षांनी सर्वांना एकत्र जमा होण्याचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तेथेच झालेल्या चॅट संवाद गप्पा यातून या कार्यक्रमाचा बेत ठरला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सभामंडपात बालमित्र,बालमैत्रिणी यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन झाले.त्यानंतर ओळख परेड मध्ये दहावी परीक्षेनंतर जी का एकदाची माध्यमिक शाळा सुटली त्यानंतरचा तब्बल ३८ वर्षांचा जीवनप्रवास व सध्याची कौटुंबिक पार्श्वभूमी,जीवनातले बरे वाईट अनुभव, संकटांवर केलेली मात असा एक एक बालमित्र - बालमैत्रिण यांनी व्यासपीठावर समोर येवून परिचय करुन देऊन सर्वांसमोर मोकळेपणाने काहीही आडपडदा न ठेवता व्यक्त झाले.राणीबाला हिवाळे-साळवी या बालमैत्रिणीने मनोगतात सुंदर कविता सादर केली.
संपूर्ण कार्यक्रमाच्या अगदी आरंभीचे श्रीगणेश वंदन गीत ते शेवटचे समाप्तीचे गीत आणि मधल्या काळात स्नेहभोजन आटोपल्यानंतर सर्व बालमित्र, बालमैत्रिणी यांना मनमुराद नाचण्यासाठी धमाल कोळीगीते श्री.अशोक मुंढे व श्री. अलंकार भोईर यांनी आपल्या सुरेल व सुमधुर आवाजात साग्रसंगीत गावून सर्वांची मने जिंकली.प्रत्येकाने कोणी प्रत्यक्ष नाचून तर कोणी ठेक्यावर ताल धरून कार्यक्रमाची रंगत वाढवली. गेटटुगेदर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन (अँकरिंग) मजेदार पद्धतीने उत्स्फुर्त हजरजवाबी काव्यमय रचना,चारोळी,उखाणे,विनोद,डायलॉग बोलून श्री.दर्शन कोळी यांनी केले नंतर श्री.अलंकार भोईर,श्री.रविंद्र राऊत व श्री.मनिष गीध यांच्या संकल्पनेतून साकारलेले गेटटुगेदर कार्यक्रमाचे शर्ट किंवा ड्रेस,साडीवर परिधान करावयाचे टॅग-बॅज-पदक,सुंदर गोल्डन स्मृतीचिन्ह,गुलाब पुष्पगुच्छ,मिठाई प्रत्येक बालमित्र, बालमैत्रिणी यांना देण्यात आली.
सभामंडप,आसन व्यवस्था, स्पिकर व्यवस्था,सकाळचा नाश्ता व दुपारच्या स्नेहभोजनाची अतिउत्तम व्यवस्था श्री. अलंकार भोईर, श्री.अशोक मुंढे व श्री.ज्ञानेश्वर मुंढे यांनी पाहिली होती. नाशिकची द्राक्षे, फळे, आईस्क्रीम, ढोकळा,कचोरी, केक इत्यदी खाऊ बालमैत्रिणी राणीबाला,सविता शेंडे,सुरेखा दुधे,सुजाता गवळी, बेबी,निकिता,लता भंडारकर,लता पालकर यांनी अगत्याने व आवडीने आणला होता.
श्री.अनिल पाटील यांनी मैत्रीचा सेतू (Friendship Bridge) बांधून बालमित्र,बालमैत्रिणी यांचा कार्यक्रमातला सहभाग वाढवला.डान्सर श्री.मनोज तांबोळी,श्री.नारायण भोपी,श्री.भरत पालरेचा,श्री.संदिप पाटील,श्री.अनिल मुंढे, श्री. दत्ता शिंदे,श्री.शाम म्हस्कर,श्री.सुभाष बागुल,श्री. जयंतीलाल ओसवाल,श्री.जयेश शहा,श्री.प्रविण ओसवाल,श्री.संतोष चव्हाण,श्री.पांडुरंग राऊत,श्री.नितीन राऊत,श्री.पांडुरंग पवार,श्री.नारायण पाटील,श्री.रमेश फडके,श्री.राजु किर्दुकुडे,वंदना सागवेकर,विमल जांभळे, शकुंतला जैन,तारा कांबळे,नंदा पाचपिंडे,सुमन खारकर, लता माळी,नूतन चौधरी या सर्वांनी तब्बल 38 वर्षांनी मुक्त व्यासपीठ मिळाल्याने आपापला सहभाग घेऊन सर्वांनी स्नेहमेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला.सर्वच बालमित्र, बालमैत्रिणी यांचा कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मोलाचा वाटा होता.हे सर्वजण आता वयाच्या 50 प्लस घरातील झाले आहेत.सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांनी आपल्या बालमित्र व बालमैत्रिणीं सोबत खूप धमाल करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांचा निरोप घेऊन आनंदाने भारलेल्या व संमिश्र भावनांनी भारावलेल्या अशा सर्वांनी पुन्हा लवकरच एकत्र येऊ असा आशावाद व्यक्त करत चिमणपाखरे आपापल्या घरट्यात परतली.जे बालमित्र, बालमैत्रिणी काही कारणांनी येवू शकले नाहीत त्यांनी नंतर whatsapp group वर फोटो व video clip पाहून आपण हे सुवर्णमयी क्षण मिस केले म्हणून खंत व्यक्त केली.
श्री.अलंकार भोईर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी समारोपाच्या आभारप्रदर्शनात विचार मांडले की - मैत्री म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली, मन मोकळं करण्याची उत्तम सोय, मैत्री एक सुख दुःखाची देवाण घेवाण,मैत्री म्हणजे मस्ती, मैत्री म्हणजे मनुष्य जन्मातील परमेश्वराने दिलेली सर्वोत्तम भेट...नव्हे नव्हे स्वर्गीय सुखच जणू! याच अमूल्य अशा क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य आपणा सर्वांमुळे मला मिळाले.या वयात सुद्धा ते जुने दिवस आठवले,जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
प्रत्येक जण खरं बोलला, मनाने बोलला.आयुष्याची निघून गेलेली कमीत कमी दहा वर्षे पुन्हा Bank Of Life च्या बँकखात्यात जमा झाल्यासारखे वाटते आहे! आपणा सर्वांच्या या सहवासाने जगण्याची एक नवीन ऊर्जा मिळाली असं वाटतं आहे. हा सहवास कधीच संपू नये असच वाटत होतं. पण असो… प्रत्येक जण या सृष्टीच्या चक्रात अडकला आहे.आयुष्यात सुख दुःख येतच राहणार, परंतु आपणा सोबतचे मिळालेले हे क्षण केवळ अनमोल,खूप मौल्यवान आहेत. खुप ओझं होतं मनावर पण तुम्ही दिलेला हा आनंद मला उरलेल्या आयुष्यासाठी एक नवी उम्मीद देऊन गेला.हा आठवणींचा साठा आपण आयुष्यभर जपून ठेवू या.आपल्या फोटोतील सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मोबाईल मधील एकही फोटो डिलीट करण्याची हिम्मतच होत नाही. कुणीतरी पुढे येऊन हे केल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. आज 38 वर्षांनी का होईना,पण आपणा सर्वांच्या आर्थिक व प्रत्यक्ष सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.आयुष्याच्या उत्तरार्धात असेच वरचेवर भेटत राहु,सुखाची मांदियाळी करत राहू.नाहीतरी उरलय काय आयुष्यात ?
Post a Comment