माणसांचे आयुष्य असलेली पुस्तके जगण्याला उभारी देतात - कोमसाप अध्यक्षा नमिता कीर ...साहित्यिक कार्यक्रमांसाठी दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार...कर्तुत्ववान महिला,महिला बचत गटांचा पुरस्काराने सन्मान
पनवेल - माणसांचे आयुष्य असलेली पुस्तके जगण्याला उभारी देतात असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर नवीन पनवेल येथे साहित्याची आनंद वारी कार्यक्रमात केले.
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व श्री.बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन,नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साहित्याची आनंद वारी या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कवितेचा जागर,गुढीपाडव्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी दिलेल्या पुस्तकांची ज्ञानरूपी गुढीचे मान्यवरांचे हस्ते पूजन,त्याचप्रमाणे सावित्रीच्या लेकी म्हणून कर्तुत्ववान महिला,महिला बचत गट यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व श्री.बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन,नवीन पनवेल यांच्यामध्ये साहित्यिक कार्यक्रमांसाठी सामंजस्य करार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराजजी विसपुते,कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील,रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुधीर शेठ,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी उपस्थित होते.
यापुढे बोलताना नमिता कीर म्हणाल्या,आपण गुढ्या उभारतो ती आपली परंपरा आहे,परंतु खऱ्या अर्थाने पुस्तकांची गुढी प्रत्येकाच्या घरी उभारली गेली पाहिजे.पुस्तके वाचली पाहिजेत.माणसांचे आयुष्य म्हणजे पुस्तक असते,त्यांच्यासाठी तो लढा असतो,संघर्ष असतो. पुस्तकातून आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात.
आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराज विसपुते यांनी आपल्या भाषणात,साहित्यिक कार्यक्रमामध्ये कर्तुत्वान महिलांचा सन्मान होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.महिला या आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत.महिलांमध्ये मातृत्व,कर्तृत्व,नेतृत्व असे गुण आहेत.हातात कुठलेही काम घ्या ते आदर्शवत केले पाहिजे. प्रमाणपत्रासाठी काम करू नका असे सांगून साहित्याची आनंद वारी अशा साहित्यिक कार्यक्रमांची गरज असून ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या विचारांचे वारसदार आज या कार्यक्रमाला लाभले असल्याचे शेवटी धनराज विसपुते यांनी सांगितले सांगितले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील यांनी,कोणतीही बोली भाषा ही शुद्धच असते त्यामुळे ती अभिजात मराठीच असून तिचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे असे सांगितले.
रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष सुधीर शेठ यांनी,साहित्यिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना लिखाणासाठी प्रेरणा मिळेल,बळ मिळेल.महिला बचत गटाच्या महिलाचा या कार्यक्रमात त्यांचा सन्मान होतोय ही आनंदाची गोष्ट असून काम करणारे हात आहेत,त्या हातांनी अनेक कुटुंबांना बळ दिले पाहिजे.कर्तुत्वात महिलांचा झालेला सन्मान भविष्यात त्यांच्याकडून समाजाला योग्य दिशा मिळेल असे सांगितले.
याप्रसंगी गृहउद्योजिका रोहिणी कुरंदेकर,एड.अपर्णा कुलकर्णी - नाडगौंडी,कवयित्री जोशना राजपूत,शिवनेरी महिला बचत गट, तुळजाभवानी महिला बचत गट यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या.महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी शुभांगी म्हात्रे हिनेदेखील आपली कविता सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती डुमरे यांनी केले.
Post a Comment