मुंबई-गोवा महामार्ग एका वर्षात पूर्ण करण्याची पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शपथ
अलिबाग (जिमाका):- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा रखडलेला विकास पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनभावनांचा आदर करीत महामार्ग एका वर्षात पूर्ण करण्याबाबत शपथ घेतली आहे .
मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णतेसाठी सातत्याने वेगवेगळ्या संस्थाकडून आंदोलन व मागण्या होत आहेत तसेच कोकणातील पत्रकार यांनी बोंबाबोंब आंदोलन करून निषेधाचे दहा हजार संदेश पाठविण्याचे नियोजन केले आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी संघटना पत्रकार व नागरिकांना महामार्गाच्या विकासासाठी स्वतः कटिबद्ध असल्याचे आश्वस्त करताना आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले आहे .
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गबाबत आंदोलनकर्त्या आपल्या सर्वांच्या भावना व कोकणवासीयांच्या भावना याच माझ्या देखील भावना आहेत. आपला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग हा तीन जिल्ह्यात विभागाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा महामार्ग पूर्ण मी पालकमंत्री असताना झाला आणि तसाच माझा प्रयत्न माझा रायगड आणि रत्नागिरीसाठी आहे.काही ठेकेदारांच्या तांत्रिक अडचणीमध्ये हायवे अडकला आहे मी स्वतः केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेतल्या आहेत तरीही अपयश येतेय,ह्याची मला कल्पना आहे पण मी आपणास शब्द देतो पुढच्या एका वर्षात काहीही करून हा हायवे पूर्ण करू ह्याची मी खात्री देतो.
तुमच्या भावनांचा आदर करून मी शपथ घेतो की पुढच्या एका वर्षात हा हायवे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन,असे याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी कळविले आहे.
Post a Comment