रायगड प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्वतोपरी सज्ज : दरडग्रस्त गावांना सतर्कतेच्या सूचना
अलिबाग (जिमाका) :- कोकणात पावसाने बऱ्यापैकी जोर धरला असून पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी सज्ज झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीप्रसंगी घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील 300 प्रशिक्षित आपदा मित्र तसेच नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत.या सर्वांना आपत्ती व्यवस्थापनाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.जिल्ह्यातील महाड, रोहा, पेण, माणगाव, कर्जत आदी शहरांमधील प्रमुख नद्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होते. या परिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर तसेच तत्सम गोष्टींसाठी तातडीने मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रबरी बोटी सज्ज ठेवल्या आहेत. एक बोट महाड नगरपालिका, तर एक बोट रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात 20 ठिकाणी अलर्ट सिस्टीम यंत्रणा उभारण्यात आली आहे. महाड शहराजवळून जाणाऱ्या नदीवर दोन ठिकाणी रिव्हर लेव्हल गेज बसविण्यात आले आहेत.
मागील काही वर्षांचा अनुभव पाहता उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपर्क यंत्रणा बाधित झाली होती. मात्र यावेळी जिल्हा व पोलीस प्रशासनाने याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. पोलीस विभागाची वायरलेस यंत्रणा,हॅम रेडिओच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, संबंधित तहसिलदार कार्यालयांमध्ये संपर्क व्यवस्था अबाधित राखण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माथेरान, रायगड किल्ला, महाड गणेश टेकडी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रिपीटर स्टेशन उभारण्यात येत असून महाड उपविभागामध्ये वायरलेस कम्युनिकेशन यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील 82 महसूल मंडळ केंद्रांवर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आली आहेत. महाड तालुक्यात 26 पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. मोबाईल टॉवरला अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी जनरेटरची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अतिरिक्त संपर्क व्यवस्था म्हणून 21 सॅटेलाईट फोनदेखील उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना 24 तास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरडग्रस्त गावांना सतर्कतेच्या सूचना :- ....
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात 6, मुरुड 6, पेण 10, पनवेल 3, उरण 1, कर्जत 4, खालापूर 8, रोहा 16, सुधागड 3, माणगाव 7, श्रीवर्धन 7, म्हसळा 6, महाड 75, पोलादपूरमध्ये 59 गावे अशी एकूण 211 दरडप्रवण गावे आहेत. या सर्व गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या गावांना भेटी देऊन कोणती खबरदारी घ्यावी, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नागरिकांमध्ये पावसाळ्यात काय करावे, काय करु नये, आरोग्याची काळजी कशी घेण्यात यावी, नैसर्गिक आपत्ती काळात काय करावे, काय करु नये, याविषयीची प्रसारमाध्यमे, सोशल मिडीयाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री.संदेश शिर्के आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
Post a Comment