जखमी जीवन पाटील याला खांदेश्वर पोलिसांनी न्याय देण्याची अन्याय अत्याचार निर्मुलन समितीची मागणी
पनवेल (वार्ताहर) ः - ज्याच्या हातावर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वार होवून तो जखमी झाला आहे त्याला 37 टाके पडले आहेत असे असतानाही विरोधकांवर आवश्यक असणारे गुन्हे खांदेश्वर पोलिसांनी दाखल केले नसल्याचे आमचे मत असून या संदर्भात आम्ही शासन दरबारी न्याय मागणार असल्याचे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष चाळके, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती पनवेलचे सदस्य बी.पी.लांडगे व जखमी जीवन पाटील यांनी पनवेल येथील पिसपार्क हॉटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
दि.21 मार्च 2025 रोजी कु.जीवन पाटील हा त्याच्या गाडीवरुन नवीन पनवेल येथून येत असताना त्याला दुसर्या गाडीने खरचटले तसेच पुढे जावून रिक्षाला सुद्धा ठोकले. याबाबत जीवन पाटील याने संबंधिताला विचारले असता त्याने अरेरावीची भाषा केली व माझ्या हॉटेलवर ये असे सांगितले. तेव्हा पुढे असलेल्या हॉटेलवर जीवन हा गेला असता तेथील हॉटेल कामगारांनी धारदार सुर्याने हल्ला केला. स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी त्याने हात पुढे केला असता त्याच्या दोन्ही हाताला मोठ्या प्रमाणात वार झाले. तातडीने तो पॅनेसिया हॉस्पिटलला जावून दाखल झाला. त्यानंतर तो उपचार घेवून तो खांदेश्वर पोलीस ठाण्यात त्याची तक्रार द्यायला गेला असता तेथील पोलीस अधिकारी घागरे व साळुंखे यांनी त्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तसेच त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न करून विरोधकांना मदत केली आहे. व जीवन पाटील यांनी सांगितलेली घटना व त्याप्रमाणे त्याच्यावर झालेला हल्ला व संबंधित आरोपींविरोधात तशा प्रकारची कलमे दाखल करणे आवश्यक असताना ती कलमे दाखल केली नाहीत. या उलट जीवन पाटील याच्यावरच जास्ती कलमे दाखल करण्यात आल्याचे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष चाळके, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती पनवेलचे सदस्य बी.पी.लांडगे व जखमी जीवन पाटील यांचे म्हणणे आहे.
तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहसचिव विभाग, पोलीस महासंचालक,पोलीस आयुक्त,पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना याबाबत त्यांनी तातडीने मेलद्वारे तक्रार केली असून जखमी जीवन पाटील याला शासनाने न्याय द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.
Post a Comment