पनवेल महानगरात २७४ कुटुबांचे वास्तव्य अतिधोकदायक इमारतीत ; धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचा जीव टांगणीला
पनवेल, दि. १० (वार्ताहर) : मुंबई आणि उपनगरात धोकादायक इमारती पडून त्यात निष्पापांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडतात.दरवर्षी या घटनेत वाढ होत असते मात्र या घटनांना पूर्णविराम मिळत नाही.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात देखील शेकडो धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत.विशेष म्हणजे पालिकेने या इमारती धोकादायक तर घोषित केल्या मात्र आजही या धोकादायक इमारतीत शेकडो कुटुंब वास्तव्यास असल्याने भविष्यात याठिकाणी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालिकेने या इमारतींची वर्गवारी केली आहे.या वर्गवारीत धोकादायक आणि अतिधोकादायक असे दोन भाग केले असून सर्वाधिक अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती पनवेल आणि कळंबोली शहरात आहेत.या 62 अतिधोकादायक इमारतीत 274 कुटुंब वास्तव्यास आहेत.पनवेल शहरात जीर्ण व धोकादायक इमारती कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत.पनवेल नगरपरिषदेच्या काळापासून या इमारती उभ्या आहेत.मध्यंतरी गणेश देशमुख पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त असताना धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळाली.पालिकेने धोकादायक ईमारतीवर बॅनर लावून धोकादायक इमारतीच्या आवारात कोणी प्रवेश करू नये असे बॅनर लावले आहेत.मात्र या धोकादायक इमारती पाडण्यासाठी पालिका प्रशासन पुढे का धजावत नाही.असा प्रश्न निर्माण झाला आहे.अतिधोकादायक इमारतीमध्ये खारघरमध्ये 3,कळंबोलीमध्ये 180,कामोठ्यात 21 आणि पनवेल शहरात 70 कुटुंब अतिधोकादायक इमारतीत वास्तव्यास आहेत.पालिकेने या ईमारतींची यादी जाहीर केली आहे.काही ईमारतींचे पाणी आणि वीज जोडणी देखील बंद करण्यास सुरुवात केली आहे. तरी यावर आता तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
Post a Comment