लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४ हजार बॅनर हटविण्यात आले ... पनवेलमध्ये २ हजार ७८३ एवढी संख्या
रायगड (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत शासकीय जागेतील, सार्वजनिक मालमत्ता तसेच खाजगी जागेवरील जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स,फलक,बॅनर व ध्वज असे एकूण14 हजार 559 हटविण्यात आले असल्याची माहिती आचार संहिता पथकाने दिली आहे.
जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार संहितेचे पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण मतदारसंघात 2 हजार 717, अलिबाग 1 हजार 09, श्रीवर्धन 2 हजार 482, महाड 1 हजार 479 तर 33-मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल 2 हजार 783, कर्जत 3 हजार 687 तर उरण मध्ये 402 पोस्टर्स, बॅनर्स, पँम्पलेट हटविण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे सर्व कार्यवाही सुरु असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी दिली आहे.
Post a Comment