अवकाळी पावसाचा फटका : डाळींचे भाव कडाडले
नवी मुंबई ( जितिन शेट्टी) : मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत अवकाळी पावसाने डाळींची आवक घटल्याने डाळींची दरवाढ झालेली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातून दाखल होणाऱ्या डाळींच्या उत्पादनाला पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे एपीएमसीत आवक घटली परिणामी एपीएमसीत तूरडाळ, उडीद डाळिंची शंभरी पार तर मुगडाळीच्या दरात ३% दरवाढ झाली आहे.
एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात, परंतु राज्यातून आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर डाळींची आवक होते.मात्र पावसामुळे उत्पादनाला फटका बसला आहे, तसेच डाळिंची आयात देखील होत नाही. त्यामुळे बाजारात डाळींची आवक घटली आहे. फेब्रुवारी पासून डाळींची दरवाढ होण्यास सुरुवात झाली असून आता पुन्हा डाळींचे दर कडाडले आहेत.
तूरडाळ ४०८५ क्विंटल , उडीद डाळ १४१४क्विंटल आणि मुगडाळ १३००क्विंटल आवक झाली आहे. मे महिन्यात घाऊक बाजारात तूरडाळ प्रतकिलो १००रुपयांनी उपलब्ध होतीझ त्यामध्ये १५% दरवाढ झाली असून ११५ रुपयांवर गेली आहे. तेच उडीद डाळ ९५रुपयांवरून ६% दरात वाढ झाली असून १०१रुपयांनी विक्री होत आहे. तर मुगडाळ ९५ रुपयांवरुन ९८ रुपयांना विक्री होत आहे. यंदा डाळींचे उत्पादन कमी असल्याने यंदा डाळींचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एपीएमसी धान्य बाजारात फेब्रुवारीपासून कडधान्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.यंदा अवकाळी पावसाचा फटका डाळींच्या उत्पादनाला बसल्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. परिणामी डाळींच्या दरातही दरवाढ होत आहे. त्यामुळे यंदा डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
-निलेश वीरा, संचालक,
अन्न धान्य बाजार समिती
Post a Comment