पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची ३० एप्रिल रोजी निवडणूक
पनवेल ( संजय कदम) : पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून त्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. एकूण १८ जागांसाठी बाजार समितीची निवडणूक होणार आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पनवेल उरण तालुक्याबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी आपले शेती उत्पादन घेऊन पनवेलच्या बाजारात येतात. कांद्याबरोबरच भाजीपाला विक्रीसाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या बाजार समितीवर सातत्याने शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे. लालबावट्याने कायम या ठिकाणी प्राबल्य निर्माण केले आहे. विरोधकांना बाजार समितीमध्ये कधीही जम शेकापने बसू दिला नाही.
या बाजार समितीच्या सार्वजनिक निवडणुकीची बिगुल वाजले आहे. २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत नामनिर्देशक पत्र भरता येणार आहेत. ५ एप्रिल रोजी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिल पर्यंत असणार आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या दरम्यान मतदान घेतले जाणार आहे.
सत्ता टिकवण्याचे शेकापसमोर मोठे आव्हान!
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती कायम आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निर्विवाद वर्चस्व प्राप्त करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यानुसार सर्वच बाजूने तयारी करून पक्षाला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.
बाजार समितीत कमळ फुलवण्याची भाजपला संधी!
शेतकरी कामगार पक्षाची पूर्वीसारखी ताकत राहिलेले नाही. अनेक जण पक्षाला सोडून गेलेले आहेत. माजी आमदार विवेक पाटील यांच्याशिवाय ही निवडणूक लढावी लागणार आहे. त्यातच ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा प्रभाव आहे. त्यामुळे येणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कमळ फुलवण्याची मोठी संधी भारतीय जनता पक्षाला असणार आहे.
Post a Comment