रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पनवेलच्या व्यावसायिकाचा भारत सरकारतर्फे दिल्लीत सत्कार : प्रसिद्ध चहावाले रवींद्र मगर यांच्यासाठी अभिमानाचा दिवस
पनवेल - भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे 'प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' योजनेअंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पनवेलच्या छोट्या व्यावसायिकाचा सत्कार करण्यात आला आहे.
दिल्ली येथे झालेल्या या सत्कार समारंभ कार्यक्रमास भारत सरकारचे केंद्रीय नगरविकास मंत्री सिंग पुरी, प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीचे सचिव मनोज जोशी, गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे सहसचिव राहुल कपूर, महाराष्ट्राच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त रोहिदास गुरुकुलकर,राज्य अभियानाचे व्यवस्थापक रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या सत्कारासाठी महाराष्ट्रातून दोघांची निवड करण्यात आली, त्यामध्ये पनवेलचे पथविक्रेते प्रसिद्ध चहा विक्रेते रवींद्र काशिनाथ मगर व ठाण्यातून अब्बास खान यांची निवड झाली.रस्त्यावर चहा व्यवसाय करणारे पनवेलचे सर्वांचे परिचित रवी यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कर्ज घेऊन त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केल्याने त्यांची महाराष्ट्रातून सत्कारासाठी निवड झाली.
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना ही,आपल्या व्यवसायासाठी निगडित छोट्या-मोठ्या बाबी व गरजांसाठी कर्ज बँकांकडून सुलभतेने मिळण्यासाठी भारत सरकारने व्यवस्था केली आहे. आतापर्यंत देशभरातील सर्व शहरांमध्ये व गावांमध्ये बँकांनी अथक प्रयत्न केल्याने २८ लाख व्यापारी बंधू-भगिनींना कर्ज वाटप करण्यात आले आहे. याच योजनेतून चहा विक्रेते असलेले रवींद्र मगर यांनी पनवेलच्या बँक ऑफ इंडियामधून सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज घेतले त्याची परतफेड व्यवस्थित केली ते कर्ज वेळेवर फेडल्याने त्यांना २० हजाराचे कर्ज पुन्हा देण्यात आले आता तेही नियमाप्रमाणे परतफेड करत आहेत,या चांगल्या कामामुळे रवींद्र मगर यांची सत्कारासाठी निवड झाली.
दिल्ली येथे सत्कार समारंभात या सत्कारमूर्तींची विशेष काळजी घेण्यात आली होती. व्यासपीठावरून आपण व्यवसाय करताना कोणी त्रास देतो का? अशी विचारणा करण्यात आली, याचे मनस्वी समाधान रवी यांना वाटले.
माझ्यासाठी अभिमानाचा दिवस - रवींद्र मगर
भारत सरकारतर्फे दिल्ली येथे झालेला माझा सत्कार हा माझा आयुष्यातील अस्मरणीय प्रसंग आहे. या सत्कारामुळे आयुष्यातील माझा तो आनंदाचा, अभिमानाचा दिवस असल्याचे रवींद्र मगर यांनी पनवेल टाइम्सशी बोलताना सांगितले.
या सत्कारासाठी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख तसेच विनिता म्हात्रे,नवनाथ थोरात यांनी नाव सुचवले असल्याचे रवींद्र मगर यांनी सांगितले.
Post a Comment