पनवेलच्या शांतीवनात काँग्रेसचे सर्वोदय संकल्प शिबिर : काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार
पनवेल: काँग्रेस पक्षाची स्थापना, विचारधारा, ध्येयधोरणे याविषयी सविस्तर माहिती देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने तीन दिवसीय सर्वोदय संकल्प शिबिराचे आयोजन पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या पुढाकाराने शांतीवन, नेरे याठिकाणी करण्यात आले होते.
शिबिराला पनवेल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शिबिराला सर्वोदय संकल्प परिवारातील धवल कीर्ती, अरविंद द्विवेदी, प्रमोद ओलेकर व जिंदा सांडभोर, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.या शिबिराच्या माध्यमातून ज्या चित्रफिती पाहावयास मिळाल्या त्यामध्ये काँग्रेस नेत्यांना कशा पद्धतीने बदनाम करून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे कटकारस्थान सत्ताधारी भाजप नेते करीत आहेत हे दाखवण्यात आले. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जनतेच्या न्याय हक्कांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या त्या सर्व योजनांची माहिती या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली.
सन १८८५ साली मुंबईमध्ये ७२ जणांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर १९१५ रोजी महात्मा गांधीजी साउथ आफ्रिकेहून भारतात आल्यानंतर खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या जडणघडणीला सुरुवात झाली.१९१५ ते १९४७ या काळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या काही घडामोडी घडल्या त्यामध्ये महात्मा गांधीजींची योगदान फार मोठे आहे.स्वातंत्र्यानंतर २ वर्षे ११ महिने १८ दिवसात भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली. १९५० साली देशाला राज्यघटना सुपूर्द करण्यात आली. १९५० ते १९६४ या कालखंडामध्ये ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या देशाला प्रगतीपथावर देण्याचे महान कार्य पंडित जवाहरलाल नेहरूजींनी केले. यामध्ये इस्रो, आयआयटी, एम्स, भाकरा नांगल धरण यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास आले. त्यामुळे काँग्रेसने देशाला खऱ्या अर्थाने वैभवाच्या शिखरावर नेण्याचे काम केले असल्याची माहिती मार्गदर्शकांनी दिली.
शिबिराची सांगता झाल्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या शिबिराला पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. आगामी महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जोमाने काम करून काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सोशल मीडियावर खोटे फोटो, व्हिडिओज शेअर करून ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम सत्ताधारी भाजपाकडून होत आहे त्याला जशास तसे उत्तर आगामी काळामध्ये दिले जाईल. आताच्या तरुण पिढीला तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेल्या कार्याची अपुरी व चुकीची माहीती भाजपच्या मीडिया सेलद्वारे पोहोचवली जात आहे. त्यामुळे शिबिरात दिलेल्या काँग्रेसच्या कार्याची माहिती काँग्रेस कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहोचवतील व त्या माध्यमातून तरुण पिढीला वस्तुस्थिती निदर्शनास येईल याची खात्री आहे.
- सुदाम पाटील,
जिल्हाध्यक्ष, पनवेल काँग्रेस
Post a Comment